Mahila va balvikas
Responsive Ads Here

Monday, April 11, 2016

लग्न करावं की करू नये हा एकच सवाल आहे.
या प्रपंच्याच्या चक्रव्युहात फाटक्या संसाराचा गुलाम बनून, बायको आणि आईची समजूत घालत बसावं आयुष्यभर आणि जगावं बेशरम लाचार आनंदानं.. की फेकून द्यावी या तारुण्याची उमेद लग्नाचा विचार न करता, त्यात गुंफलेल्या स्वप्नांच्या जगासह...
एक निर्णय आयुष्य वाचवेल, माझे, तिचे आणि आईचेही...
लग्न नावाच्या या महासर्पाने असा डंख मारावा की येणाऱ्या आयुष्याला न उरावी आशेची किनार. कधीही.. पण नंतर पुन्हा लग्नाचे स्वप्न पडू लागले तर?...
तर-तर इथंच तर मेख आहे...



आजन्म ब्रह्मचर्यात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे उपवर मुलींच्या अपेक्षांचे ओझे, त्यांच्या पालकांनी नाकं मुरडत दिलेले अगणित नकार आणि माजघरात थाटलेल्या वधूसंशोधनाच्या रंगमंचावरील ही नसती उठाठेव...
निर्जीवपणाने पुन्हा पुन्हा चकरा मारत राहतो वधू-वर केंद्रांच्या दारात. उभे राहतो पुन्हा वधू-वर मंडळात आणि मेळाव्यातही... आणि अखेर लग्नाचा प्रस्ताव घेऊन शोधत राहतो योग्य वधू...
विधात्या, तू इतका कठोर का झालास?
एका बाजूला, ज्यांनी आम्हाला जन्म दिला ते आमच्यासाठी मुली शोधणं विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला तारुण्य दिलं तो तूही आम्हाला विसरतोस...
मग कर्तृत्त्वाचा आलेख, पगाराचा आकडा, कौटुंबिक पार्श्‍वभूमी आणि सुंदरसा फोटो घेऊन हे करुणाकरा आम्हा अविवाहितांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं? कोणाच्या पायावर, कोणाच्या?

कोणी मुलगी देता का मुलगी?
एका सुसंस्कृत, निर्व्यसनी, देखण्या, सज्जन, तरुण तडफदार तुफानाला कोणी मुलगी देता का?
फक्त बायको नकोय, हवीय आयुष्यभराची साथ... कदाचित त्यानंतरचीसुद्धा...

- एक अविवाहित

 - व्यंकटेश कल्याणकर